डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अॅप्सवर नामांतर झालेल्या स्थानकांची नावे व कोड बदला

खासदार नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र

ठाणे – महायुती सरकारने राज्यातील संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर या तीन ऐतिहासिक शहरांचे नामांतर केले आहे. मात्र अद्यापही रेल्वेच्या कामकाजात जुन्या नावांचा वापर केला जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अॅप्सवर नवीन स्थानकांची नावे तसेच कोड बदलण्याची सूचना ठाणे लोकसभेचे खासदार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील तीन शहरांची नावे बदलली आहेत. त्यानुसार रेल्वे स्थानकांची कोड, डिजिटल प्लॅटफॉर्म, रेल्वे अॅप्स आणि संबंधित सर्व प्रणालींमध्ये ही नवीन नावे देखील बदलण्याची गरज असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad स्टेशन कोड: AWB) नवीन नाव : संभाजीनगर (Sambhajinagar); उस्मानाबादचे (Osmanabad, स्टेशन कोड: UMD) नवीन नाव : धाराशिव (Dharashiv); अहमदनगरचे (Ahmednagar स्टेशन कोड: ANG) नवीन नाव : अहिल्यानगर (Ahilyanagar) या बदलांचा समावेश करण्यात यावा.
रेल्वेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर (उदा. IRCTC अॅप, वेबसाइट, तिकीट बुकिंग सिस्टम इत्यादी) ही नावे आणि कोड अजूनही जुन्याच स्वरूपात दिसत आहेत. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असून नवीन नावांचा स्वीकार करण्यात अडचणी येत आहेत. तरी वरील नावे आणि त्यांचे स्टेशन कोड रेल्वेच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर तात्काळ अद्ययावत करण्याकरिता सूचना संबंधितांना द्याव्यात यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना सुविधा होईल तसेच राज्य सरकाच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

ठाण्यातील मनसेचे कार्यकर्ते सुशांत डोंबे यांनीही अशाप्रकारची मागणी खासदार नरेश म्हस्के यांना पत्र देऊन केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *